Monday, June 11, 2018

कोणी सरपंच देत का सरपंच?

                                                                                                  
              गाव म्हणल कि राजकारण आलंच. उंटवाडी गाव तसं घाणेरड्या राजकारणासाठी प्रसिद्धच. (यासाठी सोसायटीच्या राजकारणासाठी मुंबई हाय कोर्टाच्या पायऱ्या झिझावलेल उदाहरण द्यायची गरज नाही). पण अलीकडे वेगळाच प्रत्यय येतोय. काही महिन्यांपासून गावाला कुणी वालीच(सरपंच) नाही अशी परिस्थिती आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पॅनलने सरपंच निवडला खरा पण तो अडीच वर्षासाठी अस ऐकण्यात होत, त्यानुसार आता त्या उमेदवाराने राजीनामा दिल्याचं कळतं. पुढील कालावधीसाठी नवीन उमेदवाराची निवड होण्यास विलंब होतोय. तो का होतोय याच्या खोलात आपल्याला ना जायचं आहे ना रस आहे. हा उद्व्याप एवढ्यासाठीच की यामुळे होणाऱ्या गाव आणि समाज्याच्या नुकसनाबाबत चर्चा व्हावी. 
               जसा एखादा व्यक्ती निवृत्त व्हाचंच्या अगोदर कामे थंडावतात तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. सध्या तरी कुणी वालीच नसल्याने गोंधळाची परिस्थिती आहे. हा कालखंड मुलांच्या शाळा/कॉलेज प्रवेशाचा आहे. त्यांना लागणारे कागदपत्रे तलाठी/ग्रामसेवक/सरपंच यांचाकडुन भेटतात. यापैकी तलाठी हे गावात कधी नसतातच? ते उंटवाडीत का नसतात याचा जाब विचारायची हिम्मत आजपर्यंत कुणी केल्याचं ऐकण्यात नाही. तसं असत तर तलाठी गावी असते. मुलांची आणि पालकांची दुसऱ्या गावात जाण्यासाठी होणारी पायपीट वाचली असती. ग्रामसेवकांच तर काय बोलायलाच नको. ते तर अमावस्या/पौर्णिमेला गावात उगवतात. ते रोज का येत नाहीत हे विचारण्याच धैर्य कोणत्याच ग्रामपंचत पदाधिकारी यांच्यात नाही कारण प्रत्येकाची बोटे दगडाखाली असण्याची शक्यता आहे. सरपंच नसल्याने मुलांच्या नादारी अर्जावर सही-शिक्का कोण देणार? तस पण सही-शिक्का असो वा दफ्तर, हे ऑफिसात नसतंच असं ऐकण्यात आलंय. 
             आपलं गाव संख अप्पर तहसील कार्यालयाला जोडल्याने दाखले/महसुली कामांसाठी संख ला जावं लागतंय याच कुणाला गांभीर्यच  नाही. ग्रापंचायतीच बोअरवेल कुण्या दुसऱ्या व्यक्तीने वापरल्याने लाख-दीड लाख वीजबिलाचा भुर्दंड ग्रामपंचायतीला सोसावा लागणार आहे. गावातील काही तरुण उडान टाळकी ग्रामपंचायतीचे साहित्य(मोटार/ केबल/ड्रम वैगरे) दुसरीकडे हलवू नये यासाठी आदळआपट करत आहेत. त्यांना हे कळत नाही की ग्रामपंचायतीच संगणक, प्रिंटर कुठे आहे अथवा कुठे होत? ते हे नाही विचारणार की विजबिलाच भुर्दंड कोण भरणार? अरे काय करायचंच असेल तर ग्रामपंचायतीकडे खेळासाठी मैदान मागा. व्यायामशाळा मागा. ग्रामपंचायत नकार देत असेल तर खासदार, आमदार, जि. प सदस्य, पं. समिती सदस्या च्या विकासनिधीतून करता येत का बघा. फक्त निवडणुकीत दारू & मटन घेतल म्हणजे त्यांची जबादारी संपत नाही. 
              शासनाची वृक्ष लागवड योजना आली आहे त्याबाबतीत काय तयारी केलीय? विचारा की कधीतरी. शासकीय योजनांची नोटीस लागते का नोटीस बोर्डावर? नसेल तर मग फक्त मोजक्याच लोकांना का याचा फायदा होतोय? उठावा एकदा या विरुद्ध आवाज. इथे कंपूशाही(कंपूशाही म्हणजे एकमेकांना लाभ मिळवून देणारा व्यक्ती समूह) आहे. हे असंच चालू राहील तर गावच भविष्य काय असेल हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही.                                                         

टीप : यावर कुणीही चर्चा करू नये, कुणाला आक्षेप असल्यास जरूर संपर्क साधावा.


- संतोष फडतरे 

पुतळ्याच्या निमित्ताने

💫 पुतळ्याच्या निमित्ताने ✨                                      
            मित्रांनो, थोर महापुरुषांचे पुतळे व  देवदेवतांची मंदिरे उभारण्यास विरोध नाही. स्मारके, पुतळे हि नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतात. आपल्या महापुरुषांना पुतळ्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांचे विचार व साहित्य लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुतळे उभे करताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून याचा विचार केला पाहिजे. आपल्या गावातील काही अतिउत्साही तरुण मंडळींनी अशीच  पुतळे व मंदिर उभी करण्याचे योजिले आहे असे ऐकण्यात आले. लाखो रुपये खर्चून पुतळा उभा करून यांना काय साध्य करायचे आहे ते देव जाणे. एकतर गावच्या मध्यभागी असलेली तोकडी जागा त्यातच भर म्हणून नव्याने उभी केलेली झेंडे. ना कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमाला लोकांना बसता येत ना स्वतंत्रदिन, प्रज्ञासताक दिनी विद्यार्थ्यांना रांगेत उभं राहता येत. या अतिउत्साही तरुणांना पुतळा-झेंडे उभा करण्यामागचा हेतू विचारले असता ताथुर-माथूर उत्तरं देवून निघून जातात. पण हे सगळे भावनेच्या भरात निर्णय घेत असतात, यांना गावातील सुज्ञ नागरिक आणि उच्च शिक्षित तरुण प्रोत्साहन देतात हेही या मागच कटु सत्य. 
            या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी निमित्ताने डिजेवर नाचून स्वतःच मनोरंजन करुन घेणाऱ्यांना संबंधित महापुरुषांविशयी किती माहिती आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, तंटामुक्त गाव अभियान असो किंवा अलिकडचं पाणी फाऊंडेशनचे वाँटर कप, यामध्ये गावच्या सहभागासाठी ह्या मंडळींनी प्रयत्न केल्याचे ऐकण्यात नाही. पण याला अपवाद होती ती 10-12 वर्षांपूर्वीची गावातील तरुण पिढी. अन्याय निवारण आक्रमक समिती स्थापन करून दारूबंदी सारख्या विषयाला हात घातला आणि समाज प्रबोधन केल हि उल्लेखनीय बाब. त्यावेळी उभा केलेला संघटनेचा फलक  आजही साक्ष आहे. परंतु नवीन पिढीला सामावून घेवुन काम पुढे चालू ठेवण्यात हि समिती अपयशी ठरली.


                                         
 - संतोष फडतरे

कोणी सरपंच देत का सरपंच?

                                                                                                                 गाव म्हणल कि राजकारण आलं...